Vijay Thalapathy तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेला तमिळगा वेत्री कळघम हा पक्ष आणि त्याचे प्रमुख असलेल्या विजय हे सध्या चांगलेच पेचात सापडले आहेत. विधानसभा निवडणुकीत टीव्हीके राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आल्याने सत्तास्थापनेसाठी त्यांना राज्यपालांनी आमंत्रित करणे अपेक्षित होते. आधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन नंतर विधानसभेतील बहुमत चाचणीला सामोरे जाणे, ही सर्वसाधारण आणि प्रचलित प्रक्रिया आहे. मात्र, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी टीव्हीकेच्या विजय यांना बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या 118 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करा आणि त्यानंतरच सत्ता स्थापन करता येईल, अशी अट घातली आहे.
विजय थलपति कालदेखील राज्यपालांच्या भेटीला गेला होता. तेव्हा राज्यपालांनी सर्वप्रथम ही अट समोर ठेवली होती. त्यामुळे टीव्हीके पक्षाकडून करण्यात आलेले आजच्या शपथविधीचे नियोजन पाण्यात गेले. तरीही विजय हे आज पुन्हा एकदा राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, राज्यपालांनी आपली भूमिका कायम असल्याचे सांगितले. बहुमत सिद्ध केल्यानंतरच तुम्ही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकता. मला तामिळनाडूत स्थिर सरकार हवे आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर बहुमत सिद्ध कराल, तितक्या लवकर तुम्ही शपथ घेऊ शकता, असे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना सांगितल्याचे समजते.


