मुंबई : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सुत्रीचा अवलंब करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला मनसेनं पहिल्यापासूनच तीव्र विरोध केला असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन सरकारची भूमिका समजावली. मात्र, सरकारची भूमिका आपणास मान्स नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मनसेचा धागा पकडून हिंदीला विरोध नाही, पण पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आता मराठी-हिंदी भाषेच्या मुद्यावरुन राज-उद्धव या ठाकरे बंधुंच्या वक्तव्यावर आता शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. ठाकरे बंधूंचं स्टेटमेंट चुकीचं नाही, असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी ६ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाबाबतही भाष्य केलं आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, ‘माझ्यामते या सगळ्यांचा जो आग्रह आहे तो, प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची करू नये असा आहे. ५वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. देशातील एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो, त्यामुळे हिंदी भाषेला एकदमच साईडचं समजण्याचं कारण नाही. पण, लहान मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये किती भाषा ते आत्मसात करू शकतात. म्हणून ५वी पर्यंतच्या हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा’, असा सल्ला शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
‘ठाकरे बंधु जे बोलतात त्यांचे स्टेटमेंट काही चुकीचं नाही. त्यामध्ये, कोणत्या स्टेजला हिंदी हवी आणि नको ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे, मराठी भाषेवरुन एकत्र येण्यासाठी ते भूमिका घेत असतील तर मातृभाषेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे’, असेही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरेंनी आवाहन केलेल्या ६ जुलै रोजीच्या मोर्चाला तुम्ही जाणार का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, ‘हे तुम्ही मला सांगताय पण मला ते माहिती नाही. कुठलाही एक राजकीय पक्ष सामूहिक भूमिका घेऊ शकत नाही. ते म्हणाले इतर राजकीय पक्षांसोबत बोलणार आहे, ते बोलू द्या मग निर्णय घेऊ. पण, आमचा अॅप्रोच निगेटीव्ह नाही’, असंही उत्तर शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.


