बोगस लग्न लावून देणाऱ्या टोळीकडून नवरदेवाला 4 लाखाला गंडा ,
बोगस लग्न लावून देणारी टोळी संभाजीनगर जिल्ह्यातील तर जालना जिल्ह्यातील वधु ‘
शेवगाव पोलिसात नवरदेव ज्ञानेश्वर कडूळे यांनी केली तक्रार दाखल ,
शेवगाव -लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली चार लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील युवकाने सोमवार दि. ६ रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विवाहानंतर अवघ्या दोन दिवसांत नवरी निघून गेल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तक्रारीनुसार, बालमटाकळी येथील ज्ञानेश्वर महादेव कडूळे हे नेवासा परिसरात कामानिमित्त असताना वैजापूर तालुक्यातील जातेगाव येथील ज्ञानदेव मिरगे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी लग्नासाठी मुलगी असल्याचे सांगत तिचे आई-वडील नसून मावशीने तिचा सांभाळ केल्याची माहिती दिली. त्यानंतर ज्योती राजू गायकवाड, सुमनबाई साबळे आणि ज्ञानदेव मिरगे यांनी मध्यस्थी करत विवाह ठरवून त्यासाठी चार लाख रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी बुद्रुक येथील कविता दामू बर्डे हिच्याशी शेवगाव तालुक्यातील आंतरवाली येथे विवाह लावण्यात आला. मात्र, लग्नानंतर दोनच दिवसांनी संबंधित महिला कोणालाही न सांगता निघून गेल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यानंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात खोटा विवाह जुळवून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांविरोधात सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ज्ञानेश्वर कडूळे यांनी शेवगाव पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी तक्रार स्वीकारली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचे समजते.


