माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नीळकंठेश्वर पॅनेलने 21 पैकी 20 जागा जिंकत दणदणीत विजय संपादन केला. या निवडणुकीत शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्त्वात बळीराजा पॅनलचे उमेदवारही रिंगणात होते. मात्र, शरद पवारांच्या पॅनेलचा एकही उमेदवार विजय मिळवू शकला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी काकांवर पुन्हा एकदा सरशी साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु, महाराष्ट्राचे राजकारण कोळून प्यायलेल्या आणि दीर्घकालीन राजकीय आडाखे रचण्यात वाकबगार असलेल्या शरद पवार यांनी या पराभवातूनही वेगळेच राजकीय गणित साधल्याची चर्चा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांविरुद्ध पॅनेल्स रिंगणात उतरवली असली तरी त्यामुळे विरोधकांच्या मतांमध्ये फूट पडून सरतेशेवटी पवार कुटुंबाचाच फायदा झाल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत फक्त एका जागेवर सहकार पॅनेलचा एकमेव उमेदवार चंद्रराव तावरे यांच्या रुपाने निवडून आला.
शरद पवार यांनी प्रथम माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली. माळेगावमध्ये विरोधक नको असे सांगत त्यांनी राजकीय मुत्सद्दीने डाव टाकून अजित पवार यांचे विरोधक संपविले. त्यामुळे अजित पवार मतमोजणीच्या पहिल्याच दिवशी 101 पैकी 92 मतं मिळवून निवडून आले. अजित पवारांचा विजय सोपा होण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. यानिमित्ताने आम्ही सर्व एक हेच पुन्हा शरद पवार यांनी सिद्ध केल्याची चर्चा रंगली आहे.
अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी अजित पवार तब्बल 9 दिवस बारामतीत ठाण मांडून बसले होते. माळेगाव निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी साखर कारखान्याला 500 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या आश्वासनाचा मतदारांवर चांगलाच प्रभाव पडल्याचे निकालावरुन दिसत आहे. त्यामुळेच अजित पवारांनी 21 पैकी 20 जागा जिंकत दिमाखदार विजय मिळवला.


