शहरातील सर्जेपुरा, येथील धोकादायक इमारत उतरवण्याचे काम सुरू
धोकादायक इमारती मालकांनी स्वतःहून काढून घ्याव्यात, अन्यथा कारवाई : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – महानगरपालिका प्रशासनाने शहरातील १५ अतीधोकादायक अवस्थेतील इमारती पडण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यात बहुतांश इमारती या मध्य शहरातील आहेत व त्यातील काहींचा वापरही सुरू आहे. या इमारती उतरवून घेण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. सर्जेपुरा परिसरातील एका धोकादायक इमारतीचा धोकादायक भाग उतरवून घेण्यात येत आहे. नागरिकांनी धोकादायक अवस्थेतील इमारती स्वतःहून काढून घ्याव्यात, अन्यथा महानगरपालिका कारवाई करून काढतील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
धोकादायक अवस्थेत असलेल्या शहरातील १९७ इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच, १६ धोकादायक इमारतींबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. तर, १५ इमारती अती धोकादायक अवस्थेत आहेत. या धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सर्जेपुरा गल्ली येथील धोकादायक इमारत उतरवण्याचे काम सुरू करण्यात आले असून दोन दिवसांमध्ये महाजन गल्ली येथील धोकादायक इमारत हटवण्याचे काम सुरू करण्यात येणार असून. इतर इमारत मालकांनाही स्वतःहून इमारती काढून घेण्याचे आवाहन आले आहे. तसेच, १९७ इमारतींना नोटिसा बजावून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. या इमारत मालकांनाही दुरुस्ती अथवा धोकादायक भाग उतरवून घेण्यासाठी सूचना द्याव्यात, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.


