अहिल्यानगरच्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी रविवारी स्वत:ला इजा करुन घेतल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना गुरुस्थानी मानणाऱ्या भक्त संप्रदायात चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्रींची तब्येत स्थिर असल्याचे डॉ. हर्षवर्धन तनवर यांनी सांगितले आहे. महाराजांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून लवकरच ते बरे होतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे महाराजांच्या भक्तांनी त्यांना भेटायला येऊ नये. जेणेकरुन त्यांना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही, असं आवाहन डॉक्टर हर्षवर्धन तनवर आवाहन केले आहे. काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल. त्यानंतर डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
याशिवाय, तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचा रुग्णालयातील एक प्रतिक्रिया समोर आली असून माझी प्रकृती स्थिर आहे. मी लवकरच गडावर येईल, असे शास्त्री महाराजांनी म्हटले आहे. मात्र, त्यांनी हे कृत्य का केले, याबाबत माहिती देण्यास मात्र नकार दिला आहे. मला भेटण्यासाठी कोणीही रुग्णालयात येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान जनतेच्या आशीर्वादाने माझी तब्येत बरी असल्याचे महाराजांनी म्हटले
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे रविवारी संध्याकाळी आपल्या भक्तांसोबत होते. संध्याकाळी साडेपाच वाजता भक्तांना सोडून ते आपल्या खोलीत निघून आले. यानंतर त्यांनी खोलीत स्वत:च्या अंगावर वार करुन घेतले. नंतर त्यांच्या खोलीत कोणीतरी गेल्यावर त्यांना ते जखमी अवस्थेत आढळून आले. यानंतर आदिनाथ महाराज शास्त्री यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना मानणारा मोठा भक्त परिवार अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात आहे. आदिनाथ महाराज यांनी हे पाऊल उचलल्यानं त्यांच्या पाथर्डी आणि बीड जिल्ह्यातील भक्त परिवारात मोठी खळबळ उडाली होती.


