अहिल्यानगर : बीड,अहिल्यानगर जिल्ह्यासह पाथर्डी परिसरात मोठा भक्त परिवार असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःवर वार करून घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गडाशी जोडले गेलेले लाखो भक्तगण चिंतेत पडले असून महाराजांसारख्या संयमी व्यक्तिमत्त्वाने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या महाराजांवर अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेल्या तारकेश्वर गड या ठिकाणी ते महंत म्हणून काम पाहतात. बीडच्या आष्टी तालुक्यातील महिंदा गावात तारकेश्वर गड अध्यात्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या घटनेनंतर भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराजांनी स्वतःवर वार केले असले तरी, त्यांना या कृत्यासाठी प्रवृत्त करणारा नराधम कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अलीकडच्या काळात संत-महंतांना जाणीवपूर्वक त्रास देणारी एक टोळी सक्रिय झाली असून, आदिनाथ शास्त्री महाराज देखील याच त्रासाला कंटाळले होते का, असा संशय भक्तांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी संशयित व्यक्तींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) पोलिसांनी तातडीने तपासावेत, अशी मागणी अनुयायांनी केली आहे. बाबा स्वतःहून काही सांगणार नाहीत, त्यामुळे पोलिसांनीच या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे.
कॉल डिटेल्समध्ये दडलाय आदिनाथ महाराजांचा गुन्हेगार? ‘सीडीआर’ ठरणार मोठा पुरावा
- Advertisement -


