अहिल्यानगर -तालुक्यातील वाळुंज येथे शेत रस्त्याच्या जुन्या वादातून शेतकर्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रदीप बाबासाहेब भवर (वय 43, रा. वाळुंज) असे जखमी शेतकर्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशीनाथ रामचंद्र मोकाटे, आशा काशीनाथ मोकाटे व सार्थक काशीनाथ मोकाटे (सर्व रा. वाळुंज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना बुधवारी (18 मार्च) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वाळुंज शिवारातील फिर्यादीच्या घरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली. गुन्हा गुरूवारी (19 मार्च) दाखल झाला आहे. फिर्यादी प्रदीप भवर हे आपल्या दुचाकीवरून शेताकडे जात होते. यावेळी शेत रस्त्याच्या कारणावरून संशयित आरोपी काशिनाथ मोकाटे, आशा मोकाटे आणि सार्थक मोकाटे यांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी संगनमत करून प्रदीप यांना शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, आरोपींनी हातातील दगडाने प्रदीप यांच्या डोक्यावर प्रहार केला.
या झटापटीत आशा मोकाटे हिने फिर्यादीच्या पायाला जोरात चावा घेऊन त्यांना जखमी केले. आज तुला सोडले आहे, तुझ्याकडे एक दिवस बघून घेऊ, अशी धमकी देत आरोपींनी तेथून पळ काढला. जखमी प्रदीप यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अंमलदार आबासाहेब झावरे अधिक तपास करत आहेत.


