पश्चिम आशियातील तणावामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. काही प्रमाणात एलपीजीचा पुरवठ्या सुधारणा झाली मात्र बहुतांश भागात गॅस टंचाई भासत आहे. यामुळे लोकं चिंतेत पडली आहेत. नागरिकांपुढे इंधनाचा प्रश्न जटील होत असतानाच सरकारने देशातील नागरिकांना दिलासा दिला आहे. घरगुती गरजांसाठी गॅसची कमतरता भासणार नसल्याची ग्वाही सरकारने दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, घरगुती एलपीजी सिलिंडर, पाईपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू म्हणजेच पीएनजी आणि वाहनांसाठी इंधन म्हणून वापरला जाणारा सीएनजीयांचा १००% पुरवठा सुनिश्चित केला जातोय. म्हणजेच जनतेला गॅसच्या तुटवड्याबद्दल काळजी करण्याची गरज नाहीये. सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि आंतरराष्ट्रीय संकटाचा जनतेवरील परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
जागतिक परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या आयातीवर परिणाम झाला असला तरी, देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत राहिली आहे. देशांतर्गत ग्राहकांना प्राधान्य दिले जात आहे, जेणेकरून त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही, असं सरकारी अधिकाऱ्यांनी नवी माहिती देताना सांगितलंय.
व्यावसायिक एलपीजी पुरवठा देखील हळूहळू पूर्वपदावर येत असून तो सध्या अंदाजे ७०% क्षमतेने सुरू आहे. विशेषतः रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना सर्वप्रथम गॅस पुरवला जात आहे, जेणेकरून अत्यावश्यक सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहतील. याव्यतिरिक्त औषधनिर्माण, पोलाद, कृषी आणि बियाणे यांसारख्या प्रमुख क्षेत्रांनाही प्राधान्य दिले जात आहे.
विशेष म्हणजे, एप्रिलमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत दैनंदिन विक्री जवळपास दुप्पट झाली आहे. कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये गॅसची मागणी झपाट्याने वाढली आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी २२ राज्यांना अतिरिक्त १०% एलपीजी वाटप दिले जात आहे. स्थलांतरित कामगारांसाठी ५-किलोच्या लहान सिलिंडरचा पुरवठाही जवळपास दुप्पट करण्यात आला आहे. जेणेकरून कामगारांना सहजगत्या सिलिंडर मिळेल. नैसर्गिक वायू पुरवठ्यात कोणतीही मोठी समस्या नाही. तो पूर्णपणे घरगुती वापरासाठी राखीव ठेवण्यात आलाय , हेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.


