पुण्यातील भोर येथील नसरापूरमध्ये अत्याचार करून चिमुकलीची हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी भीमराव कांबळे हा यापूर्वीच लैंगिक अत्याचाराच्या दोन प्रकरणांमध्ये आरोपी आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर तो मुक्तपणे फिरत असून त्यामुळेच हा गुन्हा करण्याची हिम्मत झाली,असा आरोप केला जातोय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना यापुढे पॅरोल मिळणार नाही, असा कायदा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातील एक महत्त्वाची निर्णय म्हणजे, आरोपींना पॅरोलबाबत घेण्यात आला. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा करण्यासंदर्भाती निर्देश दिलेत. फडणवीस सरकार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत आहे.
लैंगिक प्रकरणात ८० ते ९० टक्के आरोपी हे त्याच गुन्ह्यात अटक होऊन पॅरोलवर सुटलेले असतात. त्या काळात ते परत तेच गुन्हे करतात, असं आकडेवारीवरुन समोर येतंय. २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका, असा कायदा अंमलात आला होता. परंतु दोन ते तीन वर्षानंतर हा कायदा न्यायालयाने रद्द केला होता. आता पुन्हा तसाच कायदा करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः नसरापूर येथील अत्याचार प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. तपासातील गती, गोळा केलेले पुरावे आणि तांत्रिक बाबींबाबत मुख्यमंत्री सातत्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलाला आवश्यक त्या सूचना ते देत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी तपासाचे वेळोवेळचे अपडेट्स घेत आहेत.
पुण्यातील नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. चिमुरडीच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टसमोर आला आहे. यात नराधमाने चिमुरडीच्या तोंडात मोजा कोंबला होता, अशी माहिती उघड झाली आहे. चिमुरडीचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. चार वर्षीय मुलीचा मृत्यू हा ॲस्फिक्सियामुळे होता. मोजा तोंडात कोंबल्यामुळे चिमुकलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यात तिचा मृत्यू झाला.


