येत्या २८ मे रोजी अजित पवारांच्या मृत्यूला चार महिने पूर्ण होतील, मात्र या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही, किंवा याबाबत काही ठोस माहिती पुढे आलेली नाही, त्याबाबत संताप व्यक्त करत रोहित पवारांनी आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आव्हान देत अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी मित्रपक्षाला भाग पाडावं असं म्हटलं आहे, त्यांनी याबाबतची पोस्ट आपल्या सोशल मिडीयावरती शेअर केली आहे, त्यामध्ये त्यांनी भाजपवरती देखील हल्लाबोल केला आहे.
रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास CBI कडं देण्याबाबतचं पत्र आणि नंतर स्मरणपत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींनी त्यांच्या मित्रपक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री आणि अजितदादांचे ‘मित्र’ फडणवीस साहेबांना दिलं होतं. नंतर अधिवेशनातही हा मुद्दा आम्ही मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक उत्तरही दिलं. पण अजितदादांना जाऊन येत्या २८ तारखेला ४ महिने होतायत, तरी अद्यापही हा तपास CBI कडं दिलेला नाही. त्यामुळं माझं सुनेत्राकाकींना आवाहन आहे म्हणा, आव्हान (Challenge) आहे म्हणा किंवा विनंती आहे म्हणा… की त्यांनी येत्या २८ तारखेपर्यंत हा तपास CBI कडं देण्यास त्यांच्या मित्रपक्षाला भाग पाडावं. यानिमित्ताने त्यांचा मित्रपक्ष हा खरंच मित्र आहे की मित्रपक्षालाच गिळणारा अजगरी वृत्तीचा आणखी कुणी आहे, हे स्पष्ट होईल”.
“अजितदादा हे चार-दोन महिन्यात लोकं विसरुन जातील, असे नेते नक्कीच नव्हते… सर्वांना न्याय देणारा हा ‘कामाचा माणूस’ होता आणि त्यांना न्याय कधी मिळणार, याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. यासाठी अजितदादांनी निवडून आणलेल्या पण आज ‘विकास’ निधी मिळवण्यासाठी व्यस्त असलेल्या त्यांच्या पक्षाच्या १०० टक्के आमदारांनी वेळात वेळ काढून याबाबत पाठपुरावा करायलाही हरकत नाही. शिवाय आमच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करतच आहोत, पण सगळ्या यंत्रणा हाती असलेल्या सरकारचीही काही जबाबदारी आहे की नाही? हे सरकार अजून किती दिवस लोकांना वेड्यात काढणार? एक दिवस उत्तर द्यावंच लागेल अन्यथा लोकंच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत


