मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जात आहे. वरिष्ठ आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला आहे. या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, बुधवारी पुन्हा एकदा 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महायुती सरकारनं राज्यात पुन्हा एकदा सत्तेत परत आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणात मोठी उलथापालथ होताना दिसून येत आहे. सरकारकडून चर्चेतील आणि धडाकेबाज आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या सातत्यानं बदल्या केल्या जात आहे. या बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे, विश्वास नांगरे पाटील या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही समावेश आहे. या सततच्या बदल्यांच्या आदेशामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या…
1. श्री रुचेश जैवंशी : व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई
2. श्री श्रीधर डुबे: मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (NRLM), नवी मुंबई
3. श्री निलेश सागर: आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे
4. श्री जगदीश मिनियार: मुख्य प्रशासक सिडको, छत्रपती संभाजीनगर
5. सौ. वर्षा लड्डा: आयुक्त, महिला व बालविकास, पुणे
6. डॉ. मंगेश गोंदवले: आयुक्त, अमरावती महानगरपालिका, अमरावती
7. श्री पंकज देवरे: सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), मुंबई
8. डॉ. मंजिरी मनोलकर: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे
राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत असलेल्या वरिष्ठ आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागची वेगवेगळी कारणं असू शकतात. त्यात प्रशासकीय गरज, नवीन योजनांची प्रभावी अंमलबजावणी किंवा काहीवेळा विशिष्ट अधिकाऱ्यांच्या कार्यशैली या कारणांचाही समावेश आहे. बदलीमागे काही धडाडीचे अधिकारी त्यांच्या धडक कारवाया आणि शिस्तीसाठी विशेष चर्चेत असतात.


