एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण एलपीजीच्या नियमामध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही गॅस सिलिंडरवरील अनुदानाचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. केंद्र सरकारने एलपीजी अनुदानाच्या नियम आणखी कडक केले आहेत. या नियमामुळे अनेकांना यापुढे अनुदान मिळणार नाही. बनावट आणि निष्क्रिय कनेक्शन कायमस्वरूपी कट केले जाणार आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमानुसार, जर तुमचे उत्पन्न १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला उच्च उत्पन्न गटामध्ये समावेश केला जाईल. उत्पन्न जास्त असल्यामुळे तुम्हाला यापुढे गॅस सिलिंडरवर अनुदान मिळणार नाही. राजस्थानमध्ये सरकारकडून माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये असे दिसून आले की ४०,००० पेक्षा अधिक ग्राहक हे उच्च उत्पन्न गटात मोडतात. त्यांचे उत्पन्न १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त असताना देखील ते सिलिंडरवरील अनुदानाचा लाभ घेत आहेत.
केंद्र सरकार बनावट किंवा निष्क्रिय कनेक्शन असलेल्या ग्राहाकांनाही लक्ष्य करत आहे. अनेक कुटुंबांचे अकाऊंट मृत व्यक्तींच्या नावावर आहेत. नियमानुसार जर गॅसचा वापर अजूनही मृत व्यक्तीच्या नावावर होत असेल तर कुटुंबाने ३० दिवसांच्या आत कनेक्शन एका पात्र सदस्याच्या नावावर हस्तांतरित करणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला गॅस सबसिडी मिळत नसेल तर सर्वात आधी तुमचे बँक अकाऊंट आणि आधार कार्ड तुमच्या गॅस कनेक्शनशी जोडलेला आहे की नाही याची खात्री करून घ्या. तुमच्या केवायसीची स्थिती तपासा. जर तुमचे उत्पन्न १० लाखांपेक्षा कमी असेल आणि तरी देखील तुम्हाला सबसिडी मिळाली नसेल तर त्यामागे अनेक तांत्रिक कारणे असू शकतात. तुम्ही अधिकृत MyLPG पोर्टलवर लॉग इन करून किंवा तुमच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधून तक्रार दाखल करू शकता.


