कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई; लायसन्स रद्द करणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अहिल्यानगर : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत शहर विकासकामांचा आढावा घेतला. सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यामध्ये बोगस बी-बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून संबंधित दुकानदारांचे लायसन्स रद्द करण्यात येतील. शेतकऱ्यांची फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कांद्याच्या दरातील घसरणीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कांद्याचे दर कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे. याबाबत पणनमंत्री जयकुमार रावल विविध उपाययोजना करत असून राज्य सरकारने कांदा खरेदी सुरू केली आहे.
राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पूर्वीपेक्षा २० ते ३० टक्क्यांनी इंधन खरेदी वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली असून ३० जूनपर्यंत याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीसंदर्भातील अहवाल राज्य सरकारकडे सादर झाला असून लवकरच दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली जाईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.


