राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २७ वा वर्धापन दिन आहे. पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त केलेली एका भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. पोस्ट लिहितांना सुनेत्रा पवार अजितदादांच्या आठवणीत गहिवरून आल्या. भाषणं होतील, मेळावे होतील, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील, अशी भावनिक पोस्ट सुनेत्रा पवार यांनी केली एक्सवर केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिला वर्धापनदिन आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना एक आवाहन केलंय. दादांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया,असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारणाच्या पायावर उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या यशस्वी प्रवासाची २७ वर्षे पूर्ण करत आहे. या प्रवासात असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने पक्षाला दिलेली साथ हीच आमची खरी ताकद राहिली आहे.
पण यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. कारण आज आदरणीय अजित दादा आपल्यात नाहीत…
सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, चूक झाली तर कान धरून समजावणारे आणि चांगलं काम केलं तर पाठीवर कौतुकाची थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता.


