राज्यातील शिक्षकांची सतत वेगवेगवेगळ्या प्रकारची माहिती सादर करण्यातून आता सुटका होणार आहे. शिक्षक, मुख्याध्यापकांना दैनंदिन तीन प्रकारच्या नोंदी करण्याव्यतिरिक्त अन्य माहिती, अहवाल केवळ आठवड्यातून एकदाच, म्हणजे शनिवारी वरिष्ठ कार्यालयांना सादर करावी लागणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांना शिकवण्यासाठी अधिक वेळ मिळून रोजची अशैक्षणिक कामे कमी होणार आहेत.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी या बाबत परिपत्रक प्रसिद्ध करून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, महापालिका प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांना सूचना दिल्या आहेत. शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यासाठी शाळा स्तरावरील समित्या कमी करण्यात आल्या. यूडायस, सरल प्रणालींचे एकत्रीकरण करण्यात आले. लातूर जिल्ह्यात पथदर्शी स्वरुपात पीएम पोषण योजनेमध्ये नोंदवहीचे सुलभीकरण करण्यात आले. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा अहवाल ऑनलाइन, ऑफलाइन स्वरुपात शाळा स्तरावरून द्यावा लागतो. जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावरही शाळांना माहिती द्यावी लागते. त्यात शिक्षकांच्या अध्ययन, अध्यापनाचा वेळ जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, बीड जिल्ह्यातील आष्टी, नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या तालुक्यांतील प्रत्येकी एका केंद्रामध्ये माहितीचा वार शनिवार या उपक्रमाची पथदर्शी स्वरुपात अंमलबजावणी करण्यात आली. या प्रयोगातून ९० टक्के शिक्षकांनी समाधान व्यक्त केले, तर ९६.६ टक्के शिक्षकांनी अध्यापनासाठी अधिक वेळ मिळाल्याचे नमूद केले.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७पासून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्या समीक्षा केंद्रावर (व्हीएसके पोर्टल) विद्यार्थी उपस्थितीची नोंद, पोषण आहार दिलेल्या विद्यार्थिसंख्येची पीएम पोषण संकेतस्थळावर नोंद, विद्यार्थी सुरक्षा, विधीमंडळ कामकाज, आपत्कालीन परिस्थिती यांच्याशी संबंधित माहिती ही कामे वगळता अन्य प्रकारची माहिती, अहवाल आता मुख्याध्यापक, शिक्षकांना शनिवारीच देता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे अध्ययन-अध्यापनासाठी अधिकचा वेळ मिळू शकणार आहे.


