राज्याचं लक्ष लागलेल्या सांगली सातारा विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला असून भाजपच्या धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मोठा पराभव केला आहे. धैर्यशील कदम यांनी 593 मतं मिळवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा 301 मतांनी पराभव केला. अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली आहेत. हा निकाल म्हणजे जयंत पाटील यांच्या राजकारणासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
विधान परिषद निकालाची आकडेवारी
धैर्यशील कदम (भाजप) – 593
अभयसिंह जगताप – 292
या निवडणुकीत एकूण 895 मतदारांपैकी 894 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत 9 मते अवैध ठरली. सांगली व सातारा जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती. निकाल जाहीर होताच सांगली व सातारा जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे.
पक्षीय बलाबल कसं होतं?
भाजप – 314
राष्ट्रवादी – 205
शिवसेना – 111
राष्ट्रवादी (शरद पवार) – 119
काँग्रेस – 73
शिवसेना (ठाकरे) 01
महायुतीमध्ये योग्य समन्वय
दरम्यान, सांगली आणि सातारामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील वाद लक्षात घेता महायुतीला या ठिकाणी अडचण निर्माण होणार अशी चर्चा होती. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठा वाद झाला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे बहुमत असतानाही भाजपने त्यांची मतं फोडून आपला जिल्हा परिषद अध्यक्ष बसवला होता. त्यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत मंत्री शंभुराजे देसाई आणि मकरंद पाटील हे जखमी देखील झाले होते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या ठिकाणी वेगळी भूमिका घेऊ शकते अशी चर्चा होती.
त्याचवेळी अजित पवार हयात असताना साताऱ्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या होत्या. घडाळ्याच्या चिन्हावर शरद पवारांच्या पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले होते. मात्र दादांच्या निधनानंतर लागलेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष होतं. त्यामुळे सांगली साताऱ्याची विधान परिषदेची निवडणूक अधिक चुरशीने होणार अशी चर्चा होती. मात्र या सगळ्या अडचणींवर मात करत भाजपच्या धैर्यशील कदम यांनी अखेर बाजी मारली आहे.


