राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, अनिश गवांदे, महेबूब शेख, हेमाताई पिंपळे, प्रवीण कुंटे पाटील यांचा समावेश आहे. या सर्व प्रवक्त्यांवर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी असणार आहे. आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे महत्त्वाचे नेते हजर होते. यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार डॉ अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्रजी शिंगणे, माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या या बैठकीनंतर 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, अॅड. फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, अॅड. हेमाताई पिंपळे, डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाने 4 ऑगस्ट 2026 ला आपल्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त केल्या होत्या. पक्षाने मागील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने रद्द केल्या होत्या आणि केवळ विद्या चव्हाण व महेश तपासे यांच्याकडे प्रसारमाध्यमांची जबाबदारी दिली होती. पक्षहित आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घ्यावी”, असं आवाहनही त्यावेळी शशिकांत शिंदे यांनी केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाने ऑगस्ट 2026 मध्ये आपल्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करून संपूर्ण पॅनेल बरखास्त केले होते. बरखास्त करण्यात आलेल्या प्रवक्त्यांच्या यादीतून माजी प्रवक्ते विकास लवांडे यांना वगळण्यात आलं होतं. जुन्या प्रवक्त्यांची यादीतून डच्चू मिळाल्यानंतर आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या यादीतही त्यांना प्रवक्तेपद नाकारण्यात आलं आहे. पक्षाचा हा निर्णय आपल्यासाठी आदेशासारखा असून आपण तो स्वीकारत असल्याचं लवांडे यांनी त्यांच्या ‘एक्स’ (X) पोस्टद्वारे त्याचवेळी स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रवक्ते विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी 20 नावे जाहीर करत संबंधित नावे वारकरी संप्रदायातील कथित घुसखोर असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे हिंदुत्ववादी आणि वारकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे नवा वाद पेटला होता. त्यानंतर लवांडेंवर शाईफेकही करण्यात आली होती. प्रवक्तेपदावरुन वगळण्यात आल्यानंतर लवांडे यांना त्याच वादाचा फटका बसल्याची जोरदार चर्चा जोर धरू लागली होती.


