अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी एका सहकारी बँकेवर RBI चे निर्बंध; ठेवी काढण्यास मनाई

अशोक सहकारी बँकेवर RBI चे निर्बंध; ठेवी काढण्यास मनाई, ६ महिन्यांसाठी निर्बंध लागू

अहिल्यानगर – शहरातील अशोक सहकारी बँक लि. वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कठोर निर्बंध लादले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट १९४९ च्या कलम ३५ A आणि ५६ अंतर्गत हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

RBI ने २८ ऑगस्ट २०२६ रोजी Directive Ref. No. S4110/12-22-377/2026-27 अन्वये हे आदेश दिले आहेत. त्यानुसार २८ ऑगस्ट २०२६ रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून बँकेला पुढील ६ महिन्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध ६ महिन्यांसाठी लागू असतील आणि त्यांचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल, असे RBI ने स्पष्ट केले आहे.
निर्बंध नेमके काय ?

१) RBI च्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही नवीन कर्ज देण्यास, जुन्या कर्जाचे नूतनीकरण करण्यास, कोणतीही गुंतवणूक करण्यास, कर्ज घेण्यासह कोणतीही दायित्वे स्वीकारण्यास मनाई.
२) नवीन ठेवी स्वीकारण्यास आणि कोणतेही पेमेंट करण्यास बंदी.
३) बँकेच्या मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण करण्यावरही बंदी.
४) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बँकेच्या सध्याच्या तरलतेची स्थिती लक्षात घेता, बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून कोणत्याही रकमेची ठेव काढण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, कर्जाविरुद्ध ठेवी समायोजित करण्यास अटींच्या अधीन राहून परवानगी असेल.
५) बँक कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे, वीज बिले यासारख्या अत्यावश्यक बाबींसाठी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे.

परवाना रद्द नाही – RBI चे स्पष्टीकरण

वरील निर्देशांचा अर्थ बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे असा होत नाही, असे RBI ने आपल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती या निर्बंधांच्या अधीन राहून बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल. RBI बँकेच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवून असून ठेवीदारांच्या हितासाठी परिस्थितीनुसार या निर्देशांमध्ये आवश्यक बदल केले जातील.

ठेवीदारांना ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण

पात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर DICGC कायद्यानुसार (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा दावा मिळण्यास पात्र असणार आहे. ठेवीदारांनी अधिक माहितीसाठी www.dicgc.org.in या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या आदेशावर मुख्य महाव्यवस्थापक (Brij Raj) यांची स्वाक्षरी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles