धनंजय मुंडेंच्या मागची वादाची मालिका काही थांबायला तयार नाही… त्यातच आता धनंजय मुंडे माजलगावला प्रचाराला आल्यास विपरित घडेल, असा इशाराच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी दिलाय…त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आलाय.मात्र माजलगावमधून धनंजय मुंडेंना बोलवलंच नाही तर ते जाणार नाहीत… त्यामुळे पक्षातील अंतर्गत मुद्दा असा चव्हाट्यावर आणण्याची गरज नाही, अशी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीने व्यक्त केलीय…तर बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा जिंकण्याचा विश्वास भाजपनं व्यक्त केलाय.
खरंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं…त्यानंतर मुंडे विजनवासात गेले होते.. मात्र आता धनंजय मुंडेंची पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आणि सर्वात आधी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी या पदावरून त्यांना लक्ष्य केलं होतं..
धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुंडे वादाच्या भोवऱ्यात आहेत.. आधी करुणा मुंडेंच्या प्रकरणात कोर्टानं दिलेला विरोधातला निर्णय़…त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गेलेलं मंत्रिपद..एवढंच नव्हे तर कृषी घोटाळा आणि जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप… यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आहेत… त्यातच आधी मुंडेंच्या स्टार प्रचारकपदी झालेली नियुक्तीवरुन सोळंकेंनी पक्षाकडे केलेली तक्रार आणि आता त्यांनी माजलगावमध्ये सभा घेतल्यास विपरित परिणाम होईल, असा दिलेला इशारा… यामुळे मुंडेंच्या लोकप्रियतेचा उलटा प्रवास सुरु झालाय का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय…


