नेवासा तालुक्यातील पाचुंदा परिसरात अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली असून सख्ख्या बहिण-भावाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्वाती रामदास खरात (वय 16) आणि तिचा भाऊ किरण रामदास खरात (वय 15) हे दोघे शेतळ्याजवळ पेरू खाण्यासाठी गेले होते. यावेळी स्वातीचा अचानक पाय घसरून ती तळ्यात पडली. बहिणीला वाचविण्याच्या प्रयत्नात किरणनेही तळ्यात उडी मारली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. स्वाती आणि किरण हे दोघेही त्रिमूर्ती संकूल, तेलकुडगाव येथे शिक्षण घेत होते. ते चंद्रकांत गणपत खरात यांचे नात-नातू होते. त्यांच्या अकाली निधनामुळे खरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांच्या वडिलांचा उदरनिर्वाह चालक म्हणून काम करून होत असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे सांगितले जाते. या दुर्दैवी घटनेमुळे गावकर्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


