अहिल्यानगर -मुदत ठेवींवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून लक्षवेध मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीफने ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चास येथील शाखेसह विविध ठिकाणच्या ठेवीदारांची २ कोटी ९८ लाख ५६ हजार ६३८ रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी गोरख गिताराम काळे (वय ३९, रा. चास) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी निलेश शिवाजी फुंदे (रा. बोधेगाव, शेवगाव), महेश भास्कर भोर (रा. भोरवाडी), आकाश दत्तात्रय ढगे (रा. कामठी, श्रीगोंदा), प्रदीप चंद्रकांत जगताप (रा. पिंपळगाव पिसा, श्रीगोंदा), पुनम किशोरीलाल मुथ्था (रा. केडगाव),सुभाष तुकाराम आरडे (रा. घारगाव, श्रीगोंदा) आणि विद्या वैजनाथ ढाकणे (रा. बोधेगाव) यांनी संगनमत करून ही फसवणूक केली आहे.संस्थेच्या संचालकांनी आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून रकमा जमा केल्या. मात्र, मुदत संपल्यानंतरही ठेवी आणि व्याज परत न देता संस्थेने हात वर केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष यमने यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींनी अनेक सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभराची पुंजी हडपल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


