राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून दोन्ही पक्षावर टीका केली जात आहे. त्यात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भूमिकेवर आणि उद्धव ठाकरेंवर शिवसेना शिंदे गटाचे नेते टीका करत आहेत. विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी खळबळजनक दावा करत, राज ठाकरेंचा घातपात करण्याचा डाव होता, असा दावा केला होता. त्यामुळे, ठाकरे बंधू एकत्र येण्यावरुन महायुतीचे नेते टीका करत असताना आता एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी खळबळजनक दावा केला आहे. राज-उद्धवना एकत्र आणण्याचा प्लॅन देवेंद्र फडणवीसांचाच आहे, असे म्हणत यामागचं राजकारण देखील त्यांनी सांगितलं आहे.
दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्याच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत, असा खळबजनक दावा माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांना माहित आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंना सोडून जाऊ शकतात. उद्या कोणीही ऑफर दिली तरी ते जातील, त्यामुळे त्यांना चेकमेट करण्यासाठी फडणवीसांची ही चाल असल्याचा धक्कादायक दावाच जलील यांनी केला आहे. मुंबईत ठाकरे बंधू, हे दोन भाऊ एकत्र आले तर सर्वाधिक फटका एकनाथ शिंदे यांनाच बसेल, असेही जलील यांनी म्हटले आहे. तर, तुम्ही शिवसेना आणि मनसेसोबत जाणार का? या प्रश्नावर भाजपाला हरवण्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करायला तयार आहोत. मराठी माणसाला जे हवं होतं ते होतंय, आम्ही विरोधात असून मान्य करतो की शिवसेना ही मराठी माणसाची ताकद आहे, असे म्हणत नव्या युतीचे संकेतही जलील यांनी दिले.


