गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अर्थ खात्यांवरून विविध चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष अर्थ खात्यांवरून नाराज असल्याचं बोललं जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थ खात्याबाबत भाष्य केलं होतं. ‘राष्ट्रवादीला अद्याप अर्थखातं मिळालं नाही’, असं सांगत ‘भारतीय जनता पक्ष आमचा सन्मान राखेल असा आम्हाला विश्वास आहे’, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीला पुन्हा अर्थखातं देण्याबाबत प्रश्न विचारला होता. मात्र, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं होतं. त्यानंतर आज (१२ जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी पुन्हा एकदा अर्थखात्याच्या संदर्भात प्रश्न विचारला. यावर अगदी मोजक्या शब्दांत पण सूचक शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
(१२ जून) झालेल्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, येत्या काळात अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देण्याबाबतचे काही संकेत आहेत का? यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. “आज तरी अर्थखातं माझ्याकडेच आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा नेमकं अर्थ काय? अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे न जाण्याचे हे संकेत आहेत का? की राष्ट्रवादी काँग्रेसला हा सूचक इशारा आहे? याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीला पुन्हा अर्थखातं देण्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावरून सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चा सुरू असल्याचंही म्हटलं होतं. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, “मला तरी अद्याप अर्थखातं कोणी मागितलं नाही. मात्र, मला मागितलं तर मी त्याबाबत सांगेन. माझ्यापर्यंत अशी कोणतीही नाराजी आलेली नाही. जर माझ्यापर्यंत अशी कोणती नाराजी आली तर मी त्याबाबत बोलेन”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.


