सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट; १४ हजार ग्रामपंचायत निवडणुका व मुंबईत सरपंच भवनाची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) – सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे (भाऊ) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरील प्रशासकीय नियुक्त्या, ग्रामपंचायत निवडणुका तसेच सरपंचांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष आनंदराव जाधव, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजमल भागवत, सोलापूर जिल्हा समन्वयक अंबादास गुजर, अहिल्यानगर समन्वयक वीरू पक्षे घेरडे, उमेश भालसिंग, सातारा जिल्हा सचिव धनवडे, राज्य कोअर कमिटी उपाध्यक्ष जे. डी. टेमगिरे, भगवान भालसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका तातडीने घेण्यात याव्यात, प्रशासक नियुक्तीऐवजी ग्रामस्थांना लोकनियुक्त प्रतिनिधी मिळावेत, तसेच सरपंचांच्या विविध मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच राज्यातील सरपंच व ग्रामपंचायत प्रतिनिधींना मुंबई येथे आपल्या मागण्या मांडण्यासाठी आणि विविध प्रशासकीय कामांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुंबई येथे सरपंच भवन उभारण्यात यावे, ही मागणीही यावेळी ठामपणे मांडण्यात आली.
सरपंच परिषदेकडून मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर मंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. संबंधित मागण्यांबाबत शासन स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
याप्रसंगी ग्रामविकास विभागाचे खाजगी सचिव सुनील कोठेकर हे देखील उपस्थित होते.


