मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेत महायुती सरकारमधील अंतर्गत कारभारावर बोट ठेवत खळबळजनक आरोप केले. ते म्हणाले, “माझा प्रश्न आहे की अजितदादा आणि शिंदे गटाचे मंत्री टार्गेट का होतात? कारण ते गरीबांची समस्या जाणून घ्यायला मैदानात येतात. जे गरीबांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी ते सोडवू नयेत म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. या लोकांना लावालावी करण्यापलीकडे काहीही येत नाही आणि यांच्यात गरीबांचे प्रश्न सोडवण्याची क्षमताही नाही, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
तुम्हाला स्वतःला तर बाहेर यायचं नाही. तुम्ही फक्त टाळ्या वाजवणाऱ्यासारखे बंगल्याच्या आत बसून राहता. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायची तुमची दानत नाही. सध्या डिझेलचा इतका उद्रेक सुरू आहे, पण तुम्हाला पंपावर येऊन बघायचं नाही की लोकांचे काय हाल चाललेत. त्यात एखादा माणूस जळाला, तरी त्याला दवाखान्यात जाऊन बघण्याची सौजन्यशीलता दाखवली जात नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची अवस्था तर वाईट आहे. एखादा माणूस गंभीर आजारी असेल तर निधी मिळायला ८ दिवस लागतात; तोपर्यंत एकतर पेशंट मरतो नाहीतर घरी येतो. इतके क्रूर सरकार देशात किंवा जगात कधीही आले नसेल,” असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस १०० टक्के मराठ्यांना आरक्षण देतात, पण जरांगे पाटलांना फक्त आवडत्या मंत्र्यांनाच भेटायचं का? जे प्रश्न सोडवतात, त्यांनाच टार्गेट का करता? फक्त मराठ्यांकडे कोणताही मंत्री यायला नाही पाहिजे. त्याला नुसतं टार्गेट करा, या तुमच्या भूमिका आणि ही तुमची नितीमत्ता, खरं बोला रे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांकडे कोणताही मंत्री येऊ नये म्हणून कारस्थान रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.


