नगर तालुक्यात व्याजाच्या वादातून अपहरण, पोलिसांवर हल्ला: चौघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी
अहिल्यानगर- तरुणाच्या अपहरण प्रकरणात सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने अटकेतील चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अंमलदार खंडेराव शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संतोष कुटे, रा. सारसनगर, तसेच रामेश्वर पालवे, ज्ञानेश्वर पालवे, तेजस जावळे, तिघे रा. कोल्हार ता. अहिल्यानगर, अशी अटकेतील चौघांची नावे आहेत.
व्याजाच्या पैशाच्या वादातून आकाश कार्ले, वय 27, रा. दहिगाव साकत खुर्द, यांचे संशयित आरोपींनी अपहरण करून त्यांना मारहाण, धमकी व डांबून ठेवण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्ले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आर्थिक अडचणीमुळे त्यांनी रामेश्वर पालवे याच्याकडून 70 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्याने दरमहा पाच हजार रुपये व्याजाची मागणी केली. नकार दिल्याने आरोपींनी 20 मे रोजी रात्री त्याला घराबाहेर बोलावून स्कॉर्पिओ गाडीत बसवून मारहाण केली. तसेच 90 हजार रुपये देण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान नगर तालुका पोलिसांनी अपहृत तरुणाच्या मोबाईलचे लोकेशन कोल्हार परिसरात शोधून काढले. त्यानंतर खंडेराव शिंदे, विक्रांत भालसिंग व दोन होमगार्ड यांचे विशेष पथक कोल्हार येथे रवाना झाले. कोल्हार येथील दोस्ती हॉटेलमध्ये कैद करून ठेवलेल्या कार्ले याची सुटका करताना आरोपींनी पोलिसांवर हल्ला चढवला.
या हल्ल्यात पोलीस कर्मचारी विक्रांत भालसिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर खंडेराव शिंदे किरकोळ जखमी झाले. या हल्ल्याची स्वतंत्र फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली असून अटकेतील चौघांची चौकशी सुरू आहे.


