छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मृत मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने कुणालची आई संगीता चांदगुडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. संगीता यांनी आपल्या मुलाला तब्बल वीस वर्षांपासून आमच्यापासून दूर ठेवल्याचा दावा मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने केला होता. आता याच आरोपांना संगीता चांदगुडे यांची बहीण आणि कुणालची मावशी पल्लवी जऱ्हाड यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.सध्या घडलेल्या घटनेबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. परंतु सध्या आम्हाला या दुःखातून सावरण्यासाठी थोडा वेळ द्या, अशी कळकळीची विनंती पल्लवी जऱ्हाड यांनी केली आहे. सोबतच, वीस वर्षांपूर्वी मुलाने गाव आणि शेत सोडावं म्हणून त्याच्या डोक्यात फावडं का टाकलं होतं? त्या वेळी तुमच्या मुलाच्या जीवाचं काय होईल, याचा विचार केला नव्हता का? असा थेट सवालही पल्लवी जऱ्हाड यांनी मुरलीधर चांदगुडे यांच्या आईला केला आहे.. या आरोप-प्रत्यारोपांमुळे खवड्या डोंगर प्रकरणाला आता कौटुंबिक वादाची किनार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
संगिता आणि मुरलीधर यांच्या लग्नाविषयी घरच्यांना उशीरा माहिती दिल्याचे अथवा हे लग्न त्यांना मान्य नसल्याचे सुरुवातीच्या प्रतिक्रियातून दिसून येते. यामुळे कुटुंबात सूनेवरून विसंवाद होता, हे आता समोर येत आहे. तर संगिता यांच्या युट्युबवरील जुने व्हिडिओ समोर आले. त्यात त्यांनी नणंदेला सुनावल्याचे दिसून येते. भावाला बोलावून घेतले म्हणजे मुलांचं शिक्षण बंद होईल. आमचे हाल होतील. मी तुम्हाला फोन करेल. तुमची विनवणी करेल. पाया पडेन. असं वाटत असेल तर असं होत नसतं, असे संगिता ठणकावताना दिसतात.


