मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा बेकायदेशीर किंवा नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार सांगण्यात येत आहे. अपात्र असताना नाव न वगळलेल्या आणि नंतर शासकीय छाननी प्रक्रियेत अपात्र ठरवलेल्या महिलांची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. अपात्र असताना लाभ घेणाऱ्या महिलांनी कधीपासून योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली. अर्ज करताना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती का दिली, याविषयी चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये प्रशासकीय तपासणीला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने संशयास्पद आणि अपात्र लाभार्थी आढळून आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार महिलांना योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. परंतु प्रशासकीय छाननीत ४ लाख २२ हजार ७५८ महिला पात्र ठरल्या होत्या. तर ११ हजार ७२२ महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले.
अपात्र ठरलेल्या सर्व महिलांच्या अर्जाची पुन्हा एकदा सखोल पडताळणी केली जाणार आहे. प्रत्यक्ष लाभ घेणाऱ्या महिला खाऱ्या आहेत की बनावट, याची तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय पाटील यांनी सांगितली.
योजनेच्या लाभासाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली होती. सरकारने डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत दिली होती. महिलांच्या अर्जात तांत्रिक अडचणी आल्यानंतर वाढीव वेळ देण्यात आला होता. शासनाने ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ ही अंतिम मुदत दिली होती.
दुसरीकडे काही महिलांनी बँकेत जाऊन ई-केवायी केल्यानंतर योजनेचे हप्ते खात्यात जमा झाले नव्हते, अशी तक्रार अधिकाऱ्यांच्या कार्यालयात केली होती. आता या महिलांनी शासकीय कार्यालयात जाऊन थकीत हप्ते देण्याची मागणी केली आहे.


