राजकारणात खळबळ! मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला भाजप आमदाराची रसद? बड्या नेत्याचा गंभीर आरोप

मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींची रद्द झालेली जात प्रमाणपत्रे पुन्हा मंजूर करून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. मात्र, जरांगे यांच्या या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार प्रसाद लाड यांनीच आर्थिक रसद पुरवली आहे, असा थेट आणि गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

आमदार प्रसाद लाड हेच मनोज जरांगे यांचे ‘मास्टरमाइंड’ असून, त्यांना जरांगे यांना ‘फीडिंग’ करण्याची सवय लागली आहे, असा हल्लाबोल करत जरांगे पाटील यांना ‘अटेंशन सीकिंग’ (लक्ष वेधून घेण्याचा) रोग जडला आहे, अशी तिखट टीकाही हाके यांनी केली.

प्रसाद लाड यांच्याकडूनच जरांगेंना आर्थिक मदत?

पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, “प्रसाद लाड यांच्या ‘क्रिस्टल ग्रुप’ कंपनीत १ लाख नोकऱ्या आहेत. मात्र, तिथे आरक्षण पाळले जात नाही, कामगार कायदा लागू केला जात नाही आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर पगारही दिला जात नाही. असे असताना सरकारने प्रसाद लाड नावाचे बांडगूळ का पाळले आहे? मनोज जरांगे यांना आंदोलन उभे करण्यासाठी लाड यांनीच पैसा पुरवला आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिव्या देण्यासाठीही लाड यांनीच जरांगे यांना फूस लावली आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आई-बहिणींबद्दल अपशब्द वापरले, तेव्हा प्रसाद लाड कुठे गेले होते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ओबीसी एकजुटीसाठी राज्यभर प्रतिसभा घेणार

मराठा आंदोलनाला उत्तर देण्यासाठी आता ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. “जिथे जिथे मनोज जरांगे यांच्या सभा होतील, तिथे तिथे आम्हीही ओबीसी एकजुटीसाठी प्रतिसभा घेणार आहोत,” अशी घोषणा हाके यांनी केली. “हमखास मिळणारे आमचे आरक्षण आता संपले आहे. यावर सत्तेतील आणि विरोधातील कोणताही नेता बोलायला तयार नाही. त्यामुळे आता आम्ही ओबीसी नेत्यांनाही याबाबत जाब विचारणार आहोत,” असे ते म्हणाले.

जरांगे यांच्याकडून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न

मनोज जरांगे यांच्या भाषेवर आणि वर्तनावर टीका करताना हाके म्हणाले, “जरांगे ग्रामीण भागात गेले की पछाडल्यासारखे काहीही बडबडतात. ते कधी छगन भुजबळ, कधी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे, तर कधी चंद्रशेखर बावनकुळे आणि नारायण राणे यांना टार्गेट करतात. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांच्या आई-बहिणींवर अश्लील आणि शिवराळ भाषेत टीका करायची, ही कोणती पद्धत आहे? आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या काळातही महाराष्ट्रात कधी अशी हीन पातळीवरील भाषा पाहिली नव्हती,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles