पैठण तालुक्यातील वरुडी येथील शेतकरी प्रकाश गलधर यांनी रात्रंदिवस मेहनत करून १२ क्विंटल उन्हाळी कांद्याचे पीक घेतले. मात्र, बाजार समितीत कांदा विकल्यानंतर त्यांच्या हातात पैसे पडण्याऐवजी उलट खिशातून त्यांना ‘१ रुपया’ भरावा लागला. गलधर यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल १०० रुपये म्हणजे किलोला १ रुपये दर मिळाला. १२६२ किलो कांद्याचे त्यांना १२६२ रुपये मिळाले. तर कांद्याची हमाली, तोलाई, भराई आणि भाड्यापोटी त्यांना व्यापाऱ्याने १२६३ रुपयांची पावती दिली. म्हणजे कांदा विकूनही गलधर यांना खिशातून १ रुपया द्यावा लागला.
बाजारात कांद्याचे दर इतके कोसळले की विक्रीनंतर हमाली, तोलाई आणि इतर खर्च वजा जाता त्यांच्या पदरात काहीच उरले नाही. उलट बाजार समितीचे शुल्क भरण्यासाठी त्यांना स्वतःच्या खिशातून एक रुपया द्यावा लागला.
१५ दिवसापूर्वी सलग दोन – तीन दिवस पाऊस झाला. त्यामुळे कांदा भिजला होता. त्यामुळे भाव कमी होईल असे वाटले होते. पण बाजारपेठेत कांदा नेला तेव्हा दर होता एक रुपया. १२६३ रुपयाची पट्टी झाली. ती सारी रक्कम बाजार समितीमध्ये लागली. एक रुपया खिशातून द्यावा लागला.
कांद्याच्या दरावरुन वैजापूर, पैठण सध्या आंदोलने सुरू आहेत. पण कांदा दराबाबतच्या आंदोलनाकडे सरकारकडून लक्ष दिले जात नाही.


