दहावीचा निकाल जाहीर, बारावीनंतर दहावीच्या निकालातही घट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९२.९ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.६२ टक्के लागला. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.४१ सर्वांत कमी टक्के लागला.
राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रनजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी या वेळी उपस्थित होते. पुणे, मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती, नागपूर, कोकण, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. एकूण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ८९.५६ टक्के मुलगे उत्तीर्ण झाले असून, ९४.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी ९४.१० टक्के निकाल लागला होता.
राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी म्हणाले, की यंदा परीक्षा निकोप वातावरण पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. त्यासाठी २७१ भरारी पथके, महिलांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. त्याशिवाय जिल्हा स्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. एकूण आठ माध्यमांत ही परीक्षा घेण्यात आली. उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांनी नाऊमेद होऊ नये. निकाल लवकर जाहीर करून, अकरावीचे प्रवेश लवकर व्हावेत हा प्रयत्न आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
पुणे – ९४.२४
नागपूर – ८९.०७
छत्रपती संभाजीनगर – ८८. ४१
मुंबई -९४.९७
कोल्हापूर -९५.४७
अमरावती -९०.५०
नाशिक -९०.५३
लातूर -८८.४२
कोकण -९७.६२
गेल्या वर्षीच्या तुलनेत २.०१ टक्के निकालात घट झाली आहे. बारावीनंतर यंदा दहावीच्या निकालातही घट झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles