विजयानंतर मुंबईत फडणवीसांची भेट, अन् लगेच जनतेच्या सेवेसाठी हजर; अक्षय कर्डिलेंची वेगवान शैली चर्चेत
अहिल्यानगर
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी विक्रमी मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत राजकीय मैदान गाजवल्यानंतर आता विजयाच्या जल्लोषापेक्षाही जनतेची सेवा महत्त्वाची असल्याचे दाखवून दिले आहे. निकाल लागल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी अक्षय कर्डिले पुन्हा मतदारसंघाच्या कामात सक्रिय झाल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीत पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महायुतीच्या जोरदार रणनीतीसह कर्डिले कुटुंबावरील जनतेचा विश्वास पुन्हा एकदा मतपेटीतून दिसून आला आणि अक्षय कर्डिले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला.
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेत मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत केली चर्चा*
विजयानंतर अभिनंदनाचा वर्षाव सुरू असतानाच अक्षय कर्डिले यांनी वेळ न दवडता थेट मुंबई गाठली. तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेत मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तात्काळ अहिल्यानगर मध्ये परतत त्यांनी पुन्हा जनसंपर्क आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, निवडून आल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी अक्षय कर्डिले यांच्या निवासस्थानी समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांची अक्षरशः रीघ लागली आहे. विजय हा जनतेचा आहे आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,अशी भावना अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. विजयाच्या उंच लाटेनंतरही थेट कामाला लागलेल्या अक्षय कर्डिले यांच्या भूमिकेमुळे राजकारणात नवा संदेश गेल्याचे बोलले जात आहे.


