मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल मध्यरात्री उपोषण मागे घेतलं आहे. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यासाठी मनोज जरांगे यांनी काल (30 मे) सकाळी 10 वाजतापासून आमरण उपोषण सुरु केलं होतं. त्यानंतर काल रात्री मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. अभ्यासकांच्या सूचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रात्री साडेदहा वाजता जरांगे पाटलांची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री 1.15 वाजता पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं.
मनोज जरांगेंनी आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांना जी आश्वासन दिली आहेत, ती सर्व तुमच्या समोर (माध्यमांसमोर) दिली. कोणतेही आश्वासन मागे दिलेलं नाही. आम्ही दिलेली आश्वसनं मनोज जरांगे यांनी देखील वाचून दाखवली आहेत. सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतली आहे, त्यानुसारच कारवाई केलेली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
अनेक विषय राज्य सरकारकडून मान्य झाले. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी नेहमीच पुढाकार घेतला, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. तसेच मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या सुधारणा आम्ही केल्या आहेत. त्याच्यावर आता लगेच आम्ही पुढच्या दोन-तीन दिवस शासन निर्णय काढून सुरुवात करणरा आहोत.


