मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा अशा राज्यातील सर्व भागांमध्ये मराठ्यांवर आणि कुणबींवर अन्याय होत असल्यास एकजुटीने आणि आक्रमकपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ, मराठवाडा जिथे जिथे मराठ्यांवर, कुणबीवर अन्याय होईल, त्यांनी एक जीवाने आणि आक्रमकपणे उठायचे आणि 29 ऑगस्टच्या अंतरवालीच्या आंदोलनाची तयारी करायची, ही विनंती आहे. कुणाच्या दबावाला बळी पडू नका. घाबरू नका. शांत बसू नका, आक्रमक व्हा,” असे त्यांनी म्हटले.यावेळी आपल्या आगामी दौऱ्याबाबत माहिती देताना जरांगे पाटील म्हणाले की, “20 ते 25 ऑगस्टदरम्यान विदर्भ, मराठवाडा दौरा करणार आहे. 29 ऑगस्टला उपोषण करणार आहे. माझं समाजापुढे जे कर्तव्य होतं, ते मी पूर्ण केलं. राज्यातल्या सगळ्या अभ्यासकांना मी काल बोलावले होते. 29 ऑगस्टला उपोषण करायचे आहे. पुढचे जीआर कसे काढायचे, मागच्या जीआरमध्ये काय सुधारणा करायची का, काय-काय करायचं यावर मी माझे कर्तव्य पार पाडले,” असे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “उद्या मला मराठा समाज म्हटला असता की, अभ्यासक काय विरोधात बोलतात, ते नेहमी म्हणतात आमचं ऐकून घेत नाही. आम्हाला दुरुस्त्या सांगायच्या होत्या, त्या ऐकून घेतल्या नाहीत. म्हणून मी त्यांना निवांत 16 तारखेला या असे सांगितले होते. महाराष्ट्र पुढे दिसले की, यांना गोरगरिबांशी एकनिष्ठ राहायचे नाही. या लोकांना फक्त मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांचेच असून काही अभ्यासक, समन्वयक यांना बोलायचे आहे, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता इथून पुढे त्यांना मराठ्यांच्या प्रश्नाविषयी बोलता येणार नाही.”


