खा. संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपात अनेक महिने जेलमध्ये काढले आहेत. त्यामुळेच सर्वजण त्यांना भ्रष्टाचारीच दिसत असल्याने ते रोजच असे फालतू व खोटे आरोप करत असतात. त्यांना माहिती देणारे अनेकदा तोंडघशी पडले आहेत. त्यांच्या अशा खोट्या आरोपांना भिक न घालता अहिल्यानगरचा विकास हा असाच वेगाने चालू ठेवणार आहे. त्यांनी कितीही खोटे आरोप करून विकासकामांमध्ये खोडा घालून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी कामे थांबणार नसून अशांना जशासतसे उत्तर दिले जाईल, अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी सडेतोड उत्तराने विरोधकांचा समाचार घेतला.
खा. राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेने 300 ते 400 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाला आ. जगताप यांनी मुंबईतून उत्तर देत खा.राऊत व विरोधकांना टोले लगावले आहेत. आ. जगताप म्हणले, खा. राऊत यांचे रोज सकाळचे वक्तव्य व आरोप हे सर्वांसाठी मनोरंजनाचे साधन असल्याने त्यांना फार कोणी गांभीर्याने घेत नाही. सत्तेत असताना त्यांना कोणताच विकास करता आला नाहीये व आताही कोठूनच प्रसिध्दी मिळत नसल्याने ते आमच्या सारख्या काम करणार्यांवर असे खोटे आरोप करत प्रसिध्दीच्या झोतात येत आहेत.
अहिल्यानगर बदनाम करण्यासाठी शहरातील काही ब्लॅकमेलर लोकं त्यांना अशा स्वरूपाची खोटी माहिती देत आपली दुकानदारी चालू ठेवत असतात. अशांच्या ब्लॅकमेलिंग मुळे अहिल्यानगरमध्ये काहींनी आत्महत्याही केल्या आहेत. अशा ब्लॅकमेलरांच्या आरोपांकडे नगरकर कायमच दुर्लक्ष करत असल्याने ते अनेकदा तोंडघशी पडले आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेत 300 ते 400 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार खा. राऊत यांना झाला आहे. मात्र त्यांनी ज्या कालावधीत हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे, त्याकाळात तुमच्याच शिवसेनेचीच सत्ता महानगरपालिकेत होती व तुमचेच महापौर व नगरसेवक सत्ता भोगत होते.
मग त्यावेळी हा भ्रष्टाचार तुम्हाला दिसला नाही का? जर एवढा मोठा कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला असतातर एकही सिमेंटची गोणी रस्तावर पडली नाही, असा याचा अर्थ होतो. मात्र आज शहरातील रस्त्यांची कामे व दर्जा काय आहे हे नगरकर अनुभवताहेत. त्यांनी किती आरोप केले तरी नगरकरांना सर्व सत्य माहिती असल्याने ते कधीच अशा खोट्या आरोपांना बळी पडले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अशा खोट्या आरोपांनी मागेही व आत्ताही काहीही फरक पडला नाही, असे ते म्हणाले.


