विखे फॅक्टर मुळे अवघ्या चार दिवसांत आमदारकी! आ. प्राजक्त तनपुरेंकडून प्रांजळ कबुली
आम्ही दुरून ऐकून होतो, आता अनुभवले”; ४ दिवसांत आमदार झाल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी मानले विखे पाटलांचे आभार
राहुरी : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांचा नागरी सत्कार सोहळा उत्साहात राहुरी येथे पार पडला. या कार्यक्रमात बोलताना तनपुरे यांनी आपल्या विधानपरिषदेपर्यंतच्या प्रवासामागे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे योगदान असल्याची जाहीर कबुली दिली.
यावेळी बोलताना आ.प्राजक्त तनपुरे म्हणाले “मी शनिवारी पक्षात प्रवेश केला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी आमदार झालो. या संपूर्ण प्रक्रियेत आदरणीय विखे पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा आहे,” असे वक्तव्य करत त्यांनी विखे पाटील यांच्या झटपट आणि परिणामकारक कार्यशैलीचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला.तनपुरे यांनी सांगितले की, उमेदवारी मिळण्यापासून अर्ज भरण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विखे पाटील यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्यांनी दिलेल्या संधीचे सार्थक करण्यासाठी विधान परिषदेच्या सभागृहात राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. तनपुरे यांच्या निवडीमुळे राहुरी तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुळा धरणातील गाळ काढून अतिरिक्त जलसाठा निर्माण करणे, साकळाई योजनेच्या कामाला गती देणे आणि वांबोरी चारी टप्पा क्रमांक २ चे अपूर्ण काम पूर्ण करणे यावर भर दिला जाईल, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
तसेच कृषी विद्यापीठाच्या उपलब्ध जमिनीचा औद्योगिक विकासासाठी वापर करून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.पाणी, शेती, उद्योग आणि रोजगार या चार प्रमुख क्षेत्रांमध्ये समन्वय साधत अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


