राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी न करता भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना पुढची चाल दिली. भाजप नेते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. या पार्श्वभूमीवर तनपुरे लवकरच भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यातच एबीपी माझाशी बोलताना तनपुरे म्हणाले की, सध्या तत्त्व सांभाळणाऱ्यांचे राजकारण संपत चालले आहे.
माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले , तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. मात्र, दुसरीकडे आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चालले आहे याचे दुःख होते, अशी भावना प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आला होता. पण मला निष्ठा, तत्व याच्याशी प्रामाणिक राहावं असे वाटले. पण सध्याचे राजकारण म्हणजे जो तत्वाशी जोडला राहिल त्याचे राजकारण संपत आहे, याउलट जे तत्त्वांशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती आहे, अशी खंत प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली.
यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचे राजकारण असं आहे की, विरोधी पक्ष किंवा विरोधी नेता शिल्लकच राहू नये. अशाप्रकारची प्रथा देशात आणि राज्यात सुरू आहे. वेगवेगळे गुन्हा दाखल करून दबाव आणण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. याला लोकशाही म्हणत नाही, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.


