उद्धव ठाकरे हे ‘ऑपरेशन टायगर’नंतर राज्यभरात फिरुन गद्दार खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड करत असतानाच एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ठाकरेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आहे. सचिन अहिर यांनी मंगळवारी शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला तेव्हा राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. विधान परिषदेत ठाकरे गटाचे एकूण सहा आमदार होते. मात्र, आता सचिन अहिर शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाचे फक्त पाच आमदार उरले आहेत. या सगळ्यानंतर सचिन अहिर यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई होणार की नाही, अशी चर्चा सुरु झाली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या सर्व कायद्यांचा व्यवस्थित अभ्यास करुन सचिन अहिर यांना फोडल्याचे आता समोर आले आहे. सचिन अहिर हे एकटचे ठाकरे गटातून फुटून बाहेर पडले असले तरी त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई होऊ शकत नाही. याचे कारणही समोर आले आहे.
पक्षांतर बंदी कायद्यात दहाव्या अनुसूचित 8 परिच्छेदांचा समावेश आहे. यामध्ये कोणाला हा कायदा लागू होणार, कोणाला लागू होणार नाही याबाबत तरतुदी आहेत. यातील परिच्छेद पाच हा सर्वात महत्वाचा आहे, जे सचिन अहिर यांच्यासाठी ढाल – चिलखत बनलं आहे. परिच्छेत 5 नुसार पक्षांतर बंदी कायद्यातून लोकसभा अध्यक्ष – उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, राज्याच्या विधान परिषदेच्या सभापती – उपसभापती आणि विधान सभेच्या अध्यक्ष – उपाध्यक्ष या पदांवर नियुक्त झालेल्या व्यक्तींना सूट देण्यात आली आहे.


