प्रत्येक पक्षाने आपापल्या लोकप्रतिनिधींची बाजू जबाबदारपणे ऐकून घेतली आणि त्यांना आंतरपक्षीय लोकशाहीचा वापर करायची संधी दिली, तर पक्षफुटीसारखी परिस्थिती कोणत्याही पक्षावर येणार नाही, असा दावा विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपुरातील स्वेरी इंजिनिरींग काॅलेजमध्ये ‘युवा शक्तीच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राची निर्मिती’ या विषयावर विद्यार्थी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षफुटीवर भाष्य केले.
अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, भारतातील युवा पिढी संवेदनशील आणि जबाबदारीचे भान असलेली पिढी आहे. त्यांना कोणीतरी वेगळं काही शिकवण्याची गरज नाही. परंतु जी लोकं काही युवकांना अयोग्यरित्या प्रभावीत करुन त्यांच्याकडून असंवैधानिक कृत्य करुन घेत असतील, तर त्यांना थांबवण्याची गरज आहे. देशाला युवापिढीचा अभिमान आहे. युवा पिढीमुळेच भारत देश विकसित देश होईल, याची खात्री आहे.
काही वर्षांत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश असेल. भारत जगातील सर्वोत्तम देश कोण बनवत असेल तर ती युवापिढी याचे लोकप्रतिनिधीला भान असले पाहिजे. युवकांना चेतावनी न देता त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला.
विद्यार्थ्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील, तर त्या सरकारला पूर्ण कराव्या लागतील. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी व समस्या असतील तर त्या देखील सोडवणे सरकारला क्रमप्राप्त आहे. राज्यातील प्रत्येक जेन झी महाराष्ट्रासोबत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या उन्नती व प्रगतीसाठी बरोबर आहे. जिल्हा आणि विभागाच्या विकास कामांसाठी भाजपकडून बैठक घेतल्या जातात असेही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
सध्या उद्धव ठाकरे आणि आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पक्ष आणि चिन्ह यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याविषयी त्यांना विचारले असता, त्यांनी या संदर्भात अधिक भाष्य न करता पक्षामधील लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतांचा आदर राखून व त्यांना विश्वासात घेऊन काम केले, तर अशी परिस्थिती उद्भवणार नाही, असे स्पष्ट केले.


