राज्य पोलीस दलातील बदल्यांच्या राजकारणावर आणि महिला अधिकाऱ्यांवरील कथित अन्यायावर आवाज उठविणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या(सीआयडी) पोलीस अधीक्षक वैशाली माने आता अडचणीत आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच पोलिस दलात मोठ्याप्रमाणात फेरबदल करण्यात आले होते. भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलिस सेवेतील सुमारे १०० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर दोन तीन दिवसात अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या बदल्यांमध्ये मनाजोगे बदल करुन घेतले. काहींना आपल्याला नकोशा ठिकाणच्या बदल्या रद्द करुन घेतल्या. तर काहींना आहे त्यात शहरात आपली व्यवस्था करुन घेतली.
मात्र या बदल्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांना न्याय मिळाला नसल्याचा आणि महिलांना डावलेले जात असल्याचा आरोप करीत सीआयडीच्या अधिक्षक वैशाली माने यांनी पोलीस दलात खळबळ उडवून दिली. माने यांची पुण्यातून थेट मिरा भाईंदर येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. महिला अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग दिली जाते किंवा इतक्या दूरच्या ठिकाणी पाठवले जाते की तिथे प्रत्यक्ष जाऊन काम करणे कठीण होते.दुसरीकडे अनेक पुरुष अधिकारी पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे याच परिसरात वर्षानुवर्षे फिरत राहतात. काही अधिकारी चार-चार वर्षे एकाच शहरात राहतात. नवी मुंबई, पुणे किंवा ठाण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होतच नाहीत. मात्र महिला अधिकारी दोन वर्ष पूर्ण होताच बाहेर फेकल्या जातात. पुरुष अधिकारी पुण्यातून पिंपरी-चिंचवड, तिथून एटीएस, हायवे सिक्युरिटी अशा बदल्यांमधून पुन्हा त्याच शहरात राहतात. पोलीस दलात शिस्त महत्वाची असल्याचे सांगितले जाते. मग ही शिस्त केवळ महिलांसाठीच आहे का असा सवालही माने यांनी उपस्थित केला होता.
वैशाली माने यांच्या आरोपानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. गृहविभागानेही याची दखल घेत माने यांची मिरा- भाईंदरला झालेली बदली आज रद्द केली. मात्र ही बदली रद्द करताना माने यांना नव्याने कुठेत नियुक्ती न देता नव्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत म्हणजेच सक्तीच्या विश्रांतीवर ठेवण्यात आले आहे. यामुळे सरकरशी घेतलेला पंगा माने यांना महागात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गृह विभागाने आज पोलीस आस्थापना मंडळ क्र.१ यांच्या शिफारशींचा यथायोग्य विचार करुन राज्य पोलीस सेवेतील सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात दिनेश बारी यांची दोन आठवड्यापूर्वी मुंबईत उपायुक्त म्हणून झालेली बदली रद्द करुन त्यांची नियुक्ती वैशाली माने यांच्या जागी पुण्यात एसआयडीचे अधिक्षक म्हणून करण्यात आली आहे.
यशवंत सोळंके यांची अमरावतीला पोलीस उप आयुक्त म्हणून, संदिप जाधव यांची राज्य पोलीस नियंत्रण कक्ष अधिक्षक म्हणून, शशिकांत बोराटे यांची मिरा-भाईंदर पोलीस उपायुक्त म्हणून, स्मिता पाटील यांची सागरी सुरक्षा उपायुक्त तर मितेश घट्टे यांची मुंबईत पोलीस उप आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.


