अहिल्यानगर -तालुक्यातील खातगाव टाकळी येथे जमिनीच्या वाटणीच्या वादातून दोन महिलांना लोखंडी गज व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी जनाबाई मच्छिंद्र पवार (वय 35, रा. खातगाव टाकळी) यांनी बुधवारी (20 मे) फिर्याद दिली आहे. संदीप छबु पवार, संतोष छबु पवार, सुभाष राजाराम पवार (तिघे रा. खातगाव टाकळी), मारूती शिवाजी गांगुर्डे, नवनाथ शिवाजी गांगुर्डे व सुनील हरकु गांगुर्डे (तिघे रा. माळकुप, ता. पारनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.मंगळवारी (19 मे) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून फिर्यादी व तिच्या भावाबंदांमध्ये बोलणे सुरू होते. त्यावेळी अचानक संशयित आरोपी संदीप पवार याने धारदार लोखंडी वस्तूने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली. त्यानंतर इतर संशयित आरोपींनीही एकत्र येऊन फिर्यादी तसेच त्यांची जाऊ वैशाली यांना लोखंडी गज व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी संशयित आरोपींनी शिवीगाळ करत आमच्या म्हणण्यानुसार ऐकले नाही तर घरदार संपवून टाकू, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस अंमलदार मुकुंद दुधाळ अधिक तपास करीत आहेत.
जमीन वाटणीच्या वादातून दोन महिलांना मारहाण ;नगर तालुक्यातील घटना
- Advertisement -


