कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून काल नाशिकच्या चांदवडमध्ये हजारो शेतकऱ्यांनी क्रांति महामोर्चा आंदोलन केले. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड चौफुली येथे कांदा टाकून तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या सर्व मुद्द्यावर आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारची बैठक होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते. ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तब्बल 45 मिनिटे कांदा, साखर आणि इतर महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, या बैठकीमध्ये कांदा, आंब्याचे प्रश्न तसेच राज्यातील साखर उद्योगाबाबत चर्चा झाली. आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसमोर राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. इथेनाॅल साठा वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली. साखरेच्या प्रश्नावर अमित शाह यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. दोन लाखाऐवजी दहा लाख टन कांदा खरेदी नाफेड आणि एनसीसीएफने करावी, व्यापाऱ्यांकडून नाही तर शेतकऱ्यांकडून खरेदी व्हावी, MSP वाढवणे गरजेचे आहे, अशा मागण्या आम्ही या बैठकीत केल्या असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ही बैठक अतिशय सकारात्मक झाली आहे. एमएसपी वाढवणे गरजेचे आहे. हे अमित शाह यांनी देखील मान्य केले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. आंबा उत्पादन शेतकऱ्यांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न आहे. विमा कंपनीची बैठक घेऊन आंबा उत्पादकांना न्याय देणार आहोत. कांदा निर्यातीवर कोणती बंदी नाही, येत्या 10 दिवसात यावर निर्णय होईल असे या बैठकीनंतर फडणवीस म्हणाले.


