राज्यात काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे, मात्र काही ठिकाणी वरूणराजाने उघडीप दिली आहे. पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं खरं, तर काही भागांत पावसाने उसंत घेतली आहे. अशातच आता येत्या काळात, राज्यात पावसाची स्थिती कशी असेल, कुठे कसा पाऊस पडेल, याबद्दल प्रश्न मनात असून पावसाबद्दल विचारणा होत आहे. याचसंदर्भात आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा पावसाबद्दलचा नवा अंदाज समोर आला आहे. 17, 18 , 19 ऑगस्ट, आणखी 3 दिवस राज्यात मराठवाड्यात,परभणी, लातूर, धाराशिव येथे विखुरलेल्या स्वरुपाचा पाऊस होईल. विदर्भात म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती या परिसरात जोराचा पाऊस होईल, असं डख यांनी सांगितलं.येत्या काही दिवसत तुरळक असा पाऊस पडेल. मात्र चांगला पाऊस कधी पडेल याबद्दलही पंजाबराव डख स्पष्टपणे बोलले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात, साधारण 5 सप्टेंबर नंतर शेतातूनसुद्धा पाणी वाहील असा पाऊस पडणार आहे, तेव्हा मोठा पाऊस पडणार असल्याचं ते म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हा, साताऱ्याचा पश्चिम भाग, पुणे जिल्हा, कोकणपट्टीत तिथे दुपारनंतर जोराचा पाऊस पडू शकतो, असं डख म्हणाले. सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र नव्हे, पण वेगवेगळ्या भागात 18 तारखेरपर्यंत विखुरलेल्या स्वरुपाचा पाऊस पडेल. श्रीगोंदा, कर्जत जामखेड, अहिल्यानगर, बारामती या बऱ्याच भगांमध्ये या तीन दिवसांमध्ये विखुरलेल्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच पुण्यातही चांगला पाऊस होईल, याची नोंद घ्यावी असं डख यांनी नमूद केलं.फक्त नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोल्यात जोरदार मुसळधार पाऊस होईल असं डख यांनी सांगितलं. कोल्हापूरला जोरदार पाऊस होऊ शकतो, साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा जास्त जोर असेल, असं त्यांनी सांगितलं. कोकणपट्ट्यात रत्नागिरी पासून पालघर पर्यंत जोरदार पाऊस असेल. 7 ते 8 जिल्ह्यांत मोठा पाऊस होईल, मात्र उर्वरित राज्यातील जिल्ह्यांमध्ये विखुरलेला पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात सगळीकडे चांगल्या पावसासाठी ऑगस्टचा शेवट, सप्टेंबरच उजाडेल असं डख यांनी म्हटलं.


