डिसेंबरपर्यंत नगर–मनमाड महामार्गाच्या त्रासातून नागरिकांची सुटका; सुजय विखे पाटील यांचा दावा
राहुरी (प्रतिनिधी) : नगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची जाणीव असून, या कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबरपर्यंत नागरिकांची या समस्येतून सुटका होईल, असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. त्यामुळे महामार्गाच्या कामाला आता प्रत्यक्षात किती गती मिळते, याकडे राहुरीसह नगर–मनमाड मार्गावरील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोटारसायकलवरून सहभागी होत नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह निर्माण केला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
रॅलीदरम्यान माध्यम प्रतिनिधींनी नगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत डॉ. विखे पाटील यांना प्रश्न विचारला. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था, धुळीचे साम्राज्य, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा वाढलेला धोका यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर कामाला गती कधी मिळणार, असा सवाल त्यांना करण्यात आला.
यावर बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, महामार्गाच्या कामात काही अडचणी निर्माण झाल्या असून त्या दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. केवळ सोशल मीडियावर पोस्ट करणे किंवा वारंवार आंदोलने करण्यापेक्षा प्रत्यक्ष रस्ता पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे काही काळ संयम ठेवावा. डिसेंबरपर्यंत या समस्येतून नागरिकांची सुटका होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महामार्गाच्या कामातील दिरंगाईवर भाष्य करताना त्यांनी मिश्कील शैलीत, “मी मेंदूचा डॉक्टर आहे; पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला,”अशी टिप्पणीही केली. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून, मात्र नगर–मनमाड महामार्गाच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याचे त्यांनी मान्य केले.
युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराच्या उपलब्धतेवर परिणाम झाला असून त्याचा विकासकामांवर परिणाम झाल्याचेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे महामार्गाच्या प्रश्नावर केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा काम पूर्ण करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


