अहिल्यानगर जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ शाळांच्या वेळेत बदल

उष्णतेमुळे शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार

अहिल्यानगर, : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दि. १८ एप्रिल २०२६ पासून उन्हाळी सुट्टीपर्यंत शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरतील, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. उष्माघाताचे दुष्परिणाम टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत हा आदेश देण्यात आला असून, शाळांनी व्यवस्थापन समितीची मंजुरी घेऊन अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित निर्णयाची माहिती सर्व मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शिक्षकांनी परीक्षेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सकाळी ७ ते १२ या वेळेत शाळेत उपस्थित राहणे आवश्यक राहील.

————————————————————————————————————————————————————

जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर, दि. १७: भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार, १७ एप्रिल २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली असून “यलो अलर्ट” जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव व पशू-प्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

प्रशासनाने नागरिकांना खालीलप्रमाणे दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत :

नागरिकांनी काय करावे ?

– तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पुरेसे पाणी प्यावे.
– शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे, तसेच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा.
– घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
– तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.
– प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
– उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
– घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
– पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा व थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
– अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा.

कामगारांसाठी व कामाच्या ठिकाणच्या सूचना

– उन्हात काम करीत असल्यास कामगारांनी डोक्यावर टोपी किंवा पांढरा रुमाल बांधावा किंवा छत्रीचा वापर करावा.
– कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
– पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा आणि बाहेर उन्हात काम करीत असतांना थोड्या-थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी.
– सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
– गरोदर स्त्रिया व आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

काय करू नये ?

– दुपारी १२.०० ते ०३.०० वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
– उन्हात अतिकष्टाचे कामे करू नका.
– बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.
– गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
– दारु, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.
– उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
– उन्हाच्या कालावधीत शक्यतो स्वयंपाक करण्याचे टाळावे व मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

पशू-प्राण्यांची काळजी आणि आपत्कालीन संपर्क :

– गुरांना आणि पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवावे आणि त्यांना वेळेवर व पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
– लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
– उष्माघाताची लक्षणे दिसताच सर्व नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
– मदतीसाठी व आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी
१०७७, १०२, १०४, १०८ व ११२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles