पाथर्डी -भर उन्हात शेतात जनावरासाठी गवत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला घाम येवुन तो जागेवरच गतप्राण झाल्याची घटना रविवारी (दि.19) घडली. राधाकृष्ण रामचंद्र मरकड (वय 33, रा. निवडुंगा) असे मयताचे नाव आहे. राधाकृष्ण गवत कापून एक भारा डोक्यावर घेऊन सुमारे एक किलोमीटर दूर घरी आणले. नंतर दुसर्या ओझ्याने गवत आणण्यासाठी शेतात परत गेला. दरम्यान, त्याचे वडील रामचंद्र मरकड शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले असता, त्यांनी राधाकृष्णला बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले.
त्याच्याकडून काही प्रतिसाद न मिळाल्याने, वडिलांनी शेजारील शेतकर्यांना हाक मारली आणि राधाकृष्णला तात्काळ दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. उष्माघाताचा बळी असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. वैद्यकीय उत्तरीय तपासणीनंतरच (शवविच्छेदन अहवाल) मृत्युचे कारण समजेल. पोलीस नाईक अभयसिंह लबडे व प्रकाश बडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. राधाकृष्ण हा आई-वडीलांना एकुलता एक मुलगा होता. जेमतेम शेती असून दोन गाई व दहा ते बारा शेळ्या असा जोडधंदा होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, तीन विवाहित बहिणी असा परीवार आहे.
उन्हाची तीव्रता वाढली आहे. शेतकर्यांसह नागरीकांनी उन्हात काम करु नये. सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत कडक ऊन अधिक तीव्र असते. यावेळी शेतीकाम टाळावे.जीवापेक्षा इतर कोणतीही गोष्ट महत्वाची नाही. उन्हाची लाट कमी होईपर्यंत प्रत्येकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक यांनी केले आहे.


