महिलांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक शोषण केल्याच्या प्रकरणात अशोक खरात या भोंदूबाबाला अटक करण्यात आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. अशोक खरात या भोंदूची पाद्यपूजा करतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. तसंच रुपाली चाकणकर यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर आरोपही झाले होते. अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात प्रतिक्रियाही दिल्या होत्या. आशा मिरगे यांनी जे आरोप केले त्याविरोधात आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या महिलांविरोधात रुपाली चाकणकर यांनी आता भूमिका मांडली आहे. तसंच आपली लढाई ही आता कायद्याच्या चौकटीत राहून आपण लढणार आहोत असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
अशोक खरात प्रकरणात पहिल्या दिवसापासून माझी भूमिका ठाम आणि स्पष्टपणाची होती. खरातच्या कुठल्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीच्या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नव्हता. मी कुठल्याही महिलेला खरातकडे घेऊन गेले नाही. ना माझा आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओही होता, तरीही गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये अतिशय अश्लील आणि अश्लाघ्य भाषेत विधानं करत, कोणताही पुरावा नसताना माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर केलेले आरोप वेदनादायी होते. त्यामुळे आता माझी लढाई कायद्याच्या चौकटीतून आहे. इतरांप्रमाणे माझ्या कुटुंबीयांनी खरातला गुरु मानलं होतं आणि म्हणून जो पाद्यपूजेचा व्हिडीओ होता तो अतिशय जुना व्हिडीओ होता. मी तेव्हा महिला आयोगाची अध्यक्षाही नव्हते. तरीही खरात प्रकरणाचा तपास हा पारदर्शक व्हावा यासाठी मी महिला आय़ोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तरीही माझ्यावर जी काही चिखलफेक झाली आणि AI चा वापर करुन ज्या पद्धतीचे व्हिडीओ तयार केले गेले आणि सातत्याने बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. त्यामुळेच आता लढाई कायद्याच्या चौकटीतून लढणार आहे.
आशा मिरगे या बाईने एका डिबेट शोमध्ये अतिशय असभ्य भाषेत जी विधानं केली ती विधानं ऐकून मला धक्काच बसला त्यामुळेच मी ४ एप्रिलला पहिली नोटीस आशा मिरगेला पाठवली होती. कायद्यापासून पळ काढताना स्वतःचा बचाव करण्यासाठी या बाईने ही नोटीस स्वीकारली नाही. त्यामुळे नंतर दोनदा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ही नोटीस पाठवली. एकंदरीत तीनवेळा नोटीस पाठवली पण आशा मिरगेने नोटीस स्विकारली नाही. अनक्लेम्ड म्हणून ही नोटीस परत आली. त्यामुळे मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली. माननीय न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन आशा मिरगेला २ जुलै २०२६ ला सकाळी ११ वाजता कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढली आहे. त्यावेळी मीदेखील हजर असेनच, कारण आता हा लढा स्त्रित्वाच्या सन्मानाचा आहे. आशा मिरगे प्रमाणेच इतर काही महिलांनीही कोणताही पुरावा नसताना अतिशय बेताल अशी विधानं केली. सातत्याने बदनाम कऱण्याचा प्रयत्न केला. कोणताही पुरावा त्या सादर करु शकल्या नाहीत. त्या सगळ्यांना दोन दिवसांपासून मी दिल्ली उच्च न्यायालयाकडून नोटिसा पाठवल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयातही मी उपस्थित राहणार आहे.


