सोलापूरच्या म्हसवड- पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ टेम्पो विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातामधील सर्व मृत भाविक पंढरपूरच्या रांजणी गावचे आहेत. या भीषण अपघातानंतर संपूर्ण पंढरपुरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड-पंढरपूर मार्गावरून सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सिद्धनाथांचं दर्शन करून गावाकडे परताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत टेम्पो कोसळला. टेम्पो कोसळून भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये महिला, लहान मुलांचा देखील समावेश आहे.
अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली. तांदूळवाडीमधील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतीला सुरुवात केली. गावकऱ्यांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातातील मृतांची नावे अद्याप हाती आलेली नाहीत. अपघातातील मृत भाविक एकाच कुटुंबातील असल्याचा दावा केला जात आहे. तांदूळवाडीत नाशिकच्या दिंडोरीतही अशीच अपघाताची घटना घडली होती. पंढरपुरातील या अपघातामुळे राज्यातील उघड्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पंढरपूरच्या रांजणी गावातील एक ग्रुप देवदर्शनासाठी गेला होता. या ग्रुपमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुले होते. या ग्रुपने सिद्धनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. सिद्धनाथांचं दर्शन घेऊन घरी परतताना काळाने घाला घातला. भाविकांचा टेम्पो थेट विहिरीत कोसळला. अपघातानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. प्रशासनाकडून विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. भाविकांच्या मृत्यूने रांजणी गावावर शोककळा पसरली आहे.


