राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतलेले राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आता अप्रत्यक्षपणे भाजपा सोबतच आहेत, असे खळबळजनक वक्तव्य सुजय विखे यांनी केले आहे. भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तनपुरेंनी हे वृत्त फेटाळून लावले होते. पण आता विखेंच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
सुजय विखे म्हणाले की, “पूर्वी माझ्या कारखान्याची ऊसतोड एखाद्या शेतात गेली, तर ती तनपुरे गटाची की विखे गटाची, अशी चर्चा व्हायची. मात्र, आता मी सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली आहे. कोणत्याही बांधावर गेलात तरी आता फक्त ‘कमळ’च दिसेल.” स्वतःचा त्रास कमी करण्यासाठीच आपण ही व्यूहरचना केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पूर्वी ‘कमळा’साठी फक्त एका ‘दादा’ला (सुजय दादा) धावपळ करावी लागायची. आता मात्र अक्षय दादा, प्राजक्त दादा आणि सुजय दादा असे तीन-तीन दादा एकत्र आले आहेत,” असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले. काही कार्यकर्त्यांनी इतर नेत्यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारणा केली असता, विखे म्हणाले की, “आता कोणाला एकट्याला पक्षात घ्यायचे नाही, तर सर्वांना ‘पॅकेज’ स्वरूपात सोबत घ्यायचे आहे. या विधानातून त्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यासह त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याचे संकेत दिले आहेत.


